Manoj Jarange Maratha Meeting :
लोकसभा निवडणुकीवरुन राज्याचं राजकीय वातावरण तापलं असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. दरम्यान, बैठकीआधी मनोज जरांगेंनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.
‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असून कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मी मरेपर्यंत समाजाच्या बाजूनं उभं राहणार आहे, असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे. राज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे. आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.
आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीही मी समाजाशी नातं तुटू देणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने तातडीने सगेसोयरे अधिसूचना काढून कायदा करावा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला केलं आहे.
अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो, मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाजूनं आहोत. मी माझ्या समाजाच्या हिताचं बोलत आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे, असं जरांगे म्हणाले.
अंतरवाली सराटी येथे आज होणाऱ्या बैठकीला लाखो मराठा बांधव आले असून आणखीही मराठे येणार आहेत. समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणार आहे, असंही जरांगे म्हणाले. सरकारने आचारसंहितेच्या अगोदर आरक्षणाबाबत का निर्णय घेतला नाही? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय.