Sanjay Raut Thackeray Group :
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत कायम या ना-त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या टोकाच्या विधानांमुळे नेहमीच नवनवे वाद निर्माण होत असतात. त्यातच आता आणखी एक विधान त्यांना अडचणीत टाकणारं ठरत आहे. उद्धव ठाकरेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. शिवाय संजय राऊत हेदेखील असंच बोलले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करुन समाजातील मोठ्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संजय राऊतांना नोटीस येऊ शकते आणि त्यांची चौकशीदेखील होऊ शकते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही मोदी-शाह यांच्याबाबत असंच विधान केलेलं आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? बुधवारी सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी चौफेर टीकास्र सोडलं होतं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु त्यांना केवळ गुजरातबद्दल प्रेम आहे. एकामागून एक प्रकल्प गुजरातला नेल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला. ”छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. पण औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोत येथे झाला. त्यामुळेच मोदी-शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे.. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि मराठी माणूस संपवायचा आहे.” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता. हा देशद्रोह आहे- मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्र
ी एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ”पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीची विधानं करणं चुकीचं आहे. औरंगजेबाने महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिला होता, अशा व्यक्तीची तुलना पंतप्रधानांशी करणं दुर्दैवी आहे, हा देशद्रोह आहे..” असं एकनाथ शिंदे म्हणाले.